चांदणे स्वप्नातले रडवेल जेव्हा
ते टिपूनी घेत मी उगवेन तेव्हा
भेटलो नाही जरी तुजला कधी मी
देउनी जाइन कळ्या माझ्या तरी मी
फूल माझे लाव तू परसात अलगद
रोज मी येइन स्मृतींच्या ओळखीने
दरवळू होऊन अत्तर सोबतीने
खूप सारी श्वापदासम वागणारी माणसे
माणसांना माणसे ना मानणारी माणसे
लावुनी हसरे दिखाऊ चेहरे फिरतात ही
रोज अवघे सत्य खोटे पाडणारी माणसे
झापडे लावून येथे हरवती आयुष्य सारे
बंद डोळ्यांनीच मुक्ती शोधणारी माणसे
झाकलेली मूठ अपुली मिरवताना या जगी
सूर्य चष्म्याआड काळ्या झाकणारी माणसे
'त्रास होतो काजव्यांचाही अम्हाला' सांगती,
खोल अंधाऱ्या घरातुन राहणारी माणसे
जीव दुखवोनी कुणाचा वागुनी दैत्यापरी
देव दगडाला मनाने मानणारी माणसे
फक्त 'माझे', 'माझियापुरतेच' अंगण अन तिथे
'मी पणाचे' झाड मोठे लावणारी माणसे
आदित्य
गेलेले क्षण आता काही मिळणे नाही
पुस तू डोळे, ठरव यापुढे रडणे नाही
वणव्यामध्ये सुद्धा अश्रू पिऊन अवघे
जळेन पुन्हा परंतु ओले उरणे नाही
खुशाल बघ तू स्वप्न उद्याचे आणि जाण की,
स्वप्न पाहणे, स्वप्नामध्ये रमणे नाही
असेलही तो ढगाएवढा ध्यास, सिद्धता
चुकेलही पण चुकूनही घाबरणे नाही
गीतातिल अर्थात खरी बघ गंमत आहे
गाणे म्हणजे कंठशोष ओरडणे नाही
मृत्यूलाही थांबवेन मी या शब्दांनी
जगलो नाही तोवर आता मरणे नाही
आदित्य
रात्र ती हरखेल पुन्हा
तारका नटतील पुन्हा
संपलेल्या उत्सवांचा
सूर्यही उगवेल पुन्हा
एरवी थंडावलेल्या
शांतशा या मध्यरात्री
हरवलेली अचानक
माणसे दिसतील पुन्हा
काळ तो सरतोच आहे
वेळ ही भरतोच आहे
पण तरीही कोणते हे
सोहळे सजतील पुन्हा?
का उगा प्रश्नांस साऱ्या
रोज कवटाळुन बसावे
आज सोडू मोकळे, अन
ते उद्या हरतील पुन्हा
ओंजळीमध्ये जरासे
मावणारे क्षण सुखाचे
येउनी एकत्र येथे
मन्मने जुळतील पुन्हा
विसरुनी दुःखास आम्हीं
झिंगतो धुंदीत थोडे,
जोडतो अन धीर ऐसा
की मने लढतील पुन्हा
आदित्य
निःशब्द करारांचे ऋण जिकिरीचे झाले आहे
मन मारुन जगणे आता सवयीचे झाले आहे
पापाच्या अन पुण्याच्या लक्ष्मण रेखांनी येथे
आयुष्याला कुंपण-पण सक्तीचे झाले आहे
आनंदाने तुरुंग नियमांचा उपभोगत जाता,
लालुच-लक्षण ध्येयाच्या पूर्तीचे झाले आहे
असुराला, दैत्याला घाबरता घाबरता आता,
पूजेचे कारण सुद्धा भीतीचे झाले आहे
खोट्या फसव्या चेहऱ्यांच्या या जगात साधे,
खरे बोलणे चुकूनही, चोरीचे झाले आहे
दिवसा ढवळ्या राज्य चालते अवसेचे जैसे,
शहर आंधळे कुचकामी दृष्टीचे झाले आहे
'नको सांत्वने, नको दिलासे, एकांत हवा मजला'
असे काहिसे म्हणणे या सृष्टीचे झाले आहे
चितेवर तरी मनाजोगता जगेन जळता जळता,
दोन घडीचे जगणे ते मर्जीचे झाले आहे
आदित्य
रोज रोज मी मरतो येथे, कसे बसे मी जगतो येथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे.
कुठले ओझे डोक्यावरुनी जीव बिचारा वाहत जातो
कामाला मी घर सोडुनिया डोळे मिटुनी धावत जातो
कुठे नोकरी, कुठे चाकरी, रस्त्यावरती जेथे तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कर्ज काढुनी नटतो सजतो, तसे दिखाव्यापुरते नुसते
दिवस रात्र साहेबासाठी, घरी फक्त पळ-घटिका उरते
सुटला नाही साहेब देखिल अशा दुष्ट चक्रातुन येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
श्वास चालती प्रत्येकाचे घड्याळातल्या काट्यावरती
हिशोब अन वेळेची केवळ सूत्रे आठवणींतुन उरती
चंद्रसूर्यही उरकुन जाती दिवसरात्र नावाला जेथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
चालू असती व्यायामाचे महागडे क्लासेस नव्याने
कधी पेव योगाचे फुटते, कधी नृत्यही नवे-पुराणे
तरी औषधासाठी रांगा लांब लांब दिसतातच तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
स्टोरी आणिक स्टेटसचाही महापूर येताना दिसतो
प्रत्येकाच्या मैत्रीचा बाजार केवढा उत्तम भरतो
माणुस उरतो परी एकटा सोशल होता होता येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
नाती उरती कागदावरी केवळ सध्या घराघरातुन
एकच घरटे दिसायला पण वेगवेगळे मनामनातुन
रेशिमगाठी आता दिसती सैल सैल होताना येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कशास आणिक कुठली शर्यत चालू असते ठाऊक नाही
अंत कधीही, कुणासही, स्पर्धेचा येथे दिसला नाही
मरताना परि जाणिव होते, हाय! हरवले जगणे येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
---आदित्य
नसेल आता तुझे असे उरलेले काही, हरकत नाही
स्मृती सुद्धा काहीशा अपुऱ्या जगण्यासाठी, हरकत नाही
निघून तू गेलीस जरीही कायमची मार्गातुन माझ्या
रोज तरी मी ओघळेन प्राजक्त होऊनी, हरकत नाही
कधी रडावे असे वाटता कुशीत तुझिया येऊन मजला,
पाखरांसावे धाडीन अश्रू तुझ्याच पदरी, हरकत नाही
आठवणींच्या कवितेमधुनी तरळुन जाइन अलगद अस्फुट
भेटत राहीन पिंपळपानापरी वहीतुन, हरकत नाही
जिथे कुठे असशील अता तू, झरे सुखाचे फुलतिल तेथे
इथे स्मृतींचा राहील थोडा ओलावा, पण हरकत नाही
आदित्य
कशास काही विवाद व्हावा प्रेमामध्ये
मुक्यानेच संयोग घडावा दोघांमध्ये
तुझे ठेव तू तुझ्याच पाशी सल्ले सारे
उगा नको भलताच दुरावा नात्यामध्ये
तेच तेच ते रटाळ गाणे गाता गाता
फाटका तरी सूर जुळावा गाण्यामध्ये
असेच 'नाही' म्हण तू मजला लाजुन जाता,
की लाडिक होकार दिसावा जाण्यामध्ये
कधी भेटलो जर का आपण तसेच पुन्हा,
तशीच धडधड होईल का गे श्वासांमध्ये?
अजूनही मी लिहितो पत्रे तुला गुलाबी
अजूनही दव दिसेल तुजला शब्दांमध्ये
--आदित्य
यमदूताचाही जेथे जेथे थिजला पारा
उभा ठाकला रणी तूच होऊन सहारा
झेललास छातीवरती धगधगता वणवा
तूच अढळ शक्तीचा झेंडा , तू ध्रुवतारा
श्वास आजचे लाखो केवळ तुझ्याच पायी
एक एक किंकाळी घुमते ठायी ठायी
तिथे सांडले रक्त तुझे तू दैत्य जाळतो
नतमस्तक मी अभिषेकी अश्रूंस गाळतो
आदित्य
म्हणतो आता सारे काही
सोडुन द्यावे उरले सुरले
म्हणता म्हणता श्वास राहतिल
इथे मोजके उरले सुरले
आरोपांच्या फैरी झडती
तुझ्या नि माझ्या कितीतरीदा
माफी मागुन संपवून टाकू
हे नाते उरले सुरले
नसतिल जर का खोल वेदना
हृदयामध्ये जिवंत काही
नकोत फुटकळ आनंदाचे
क्षण-बिण साधे उरले सुरले
कधी हरवतो काचांमध्ये
खरा मार्ग शोधूया म्हणता,
आरशात मी मज सापडतो,
बाकी तुकडे उरले सुरले
उत्तरेच प्रश्नांची काही
घेऊन येती प्रश्न नव्याने
दोन घोट घेऊ त्यापेक्षा
प्रश्नच रिचवू उरले सुरले
मित्र जवळचे शोधत जाता,
सापडतो संकटात, उरतो
एकटाच लढणारा मी,
बघणारे बाकी उरले सुरले
मीच कधी माझ्याशी करतो
द्वंद्व मूळ तत्वांच्या साठी
लिहून जातो शब्द काहीसे
असंबद्ध अन उरले सुरले
आदित्य
मी कधी आयुष्य होतो
सर्जनाचा थेंब होतो
रंगुनी पानफुलांनी
डोलणारा वृक्ष होतो
खेळतो सूर्यासवे मी
रोज नवखा डाव ऐसा
चंद्र होतो पौर्णिमेचा
अन कधी अंधार होतो
मी कधी तलवार होतो
शत्रुचा संहार होतो
थेंब रक्ताचाच माझ्या
तळपुनी अंगार होतो
शुभ्र आकाशात मिसळुन
रंग पांघरतो निळा मी,
कोवळ्या अन भाबड्या
मन-पाखरांचे पंख होतो
मोकळे अवकाश काळ्या
काजळीने व्याप्त होता
वादळाचे रूप घेतो,
अन कधी मल्हार होतो
श्वास येथे अडखळोनी
घुसमटू लागे अताशा,
पाहता तडफड कुणाची
मी पुन्हा विश्वास होतो
भूत सारी अन रिपूही
मोकळे, मोकाट होता,
रोज सत्याचा असत्याशी
इथे संघर्ष होतो
संभ्रमामध्ये कधी मज
प्रश्न पडतो 'हेच का ते
विश्व माझे गर्भ-सुंदर?'
आणि मी व्याकूळ होतो.
आग, वणवे अन मशाली
पेटती दररोज येथे
पाहतो की रोज जगती
सर्जनाचा ऱ्हास होतो
बैसलो आहे रुतूनी
दलदलीमध्ये जगाच्या
त्यातल्या कमळापरी मी
भंगलेले फूल होतो
संपुनी जातात सारे
स्वप्नवत क्षण त्या स्मृतींचे
विसरुनी जातो अता की
मी कधी आयुष्य होतो
आदित्य
तू नको बोलूस काही,
गप्प मी ही राहतो
'कोण आधी बोलते'
बस वाट दोघे पाहतो
तू मुके बोलाव मजला
शब्द ना उच्चारता
ऐकूही येता न काही
मी तुझ्याशी बोलतो
शब्द अडखळती तुझे
अन श्वासही हेलावती
मी तसा डोळ्यांमधूनी
अर्थ सारे जाणतो
भेट व्हावी याचसाठी
येउनी जातेस तू अन
ते तुझे येणे नि जाणे
मी लपूनी पाहतो
बोलक्या नजरेमधूनी
गोष्ट सारी होत जाते
तू कधी लाजून जाता,
मी मनोमन हासतो
वेळ साधुन मी कधी
मग भेटण्या येतो तुला
अन तुझे लटकेच रुसवे
केवढे सांभाळतो
आदित्य
मौन पाळले ओठांशी आलेल्या शब्दांनी माझ्या
करार होता कसाबसा केलेला ओठांनी माझ्या
शिकलो आता मुक्यानेच सांगायाचे सारे काही
धीर सोडला तरी कधी वाहुनिया डोळ्यांनी माझ्या
असे वाटते फक्त मला जमले नाही विसरून जाणे
जमले सारे तुला मात्र मी सजलो जखमांनी माझ्या
तशी हासुनी मारून नेली वेळ भेटता तू जेव्हा
कोपऱ्यातला ओलावा टिपलेला डोळ्यांनी माझ्या
दिसे उभी तू तटस्थ पुनवेच्या राती स्वप्नातुन अन
चिंब चांदणे रिमझिमते डोळ्यांतिल चंद्रांनी माझ्या
काय नेमके झाले ऐसे मार्ग वेगळे अपुले गे,
दिलेस नाही उत्तर तू अन हरलो प्रश्नांनी माझ्या
हाय! अपेक्षा तुझी तुला मी क्षणार्धात विसरून जावे
खोटे का क्षण सारे जे अनुभवले श्वासांनी माझ्या?
करार मौनाचा अपुला पाळुन ठरलो पुरता वेडा
अजूनही तो जपतो, रडतो अवचित शब्दांनी माझ्या
आदित्य
शुभ्र शुभ्र ढगांमध्ये
मोठा बंगला दिसतो
देव आमच्या घरचा
तिथे वरती राहतो
रोज खाली येतो बाप्पा
दिवेलागणीच्या वेळी
शुभंकरोती ऐकून
छान हसूनिया जातो
गोड आवडते त्याला
कधी बर्फी कधी पेढा
कधी साखरेचा फक्त
नैवेद्यही त्याला पुरतो
इथे वाईटशा गोष्टी
त्याला कळतात साऱ्या
ठेवतो तो लिहून हे
आणि शिक्षाही करतो
देवाशी मी कट्टी घेता
थोडा थोडासा रुसतो
झाल्यावरती अभ्यास
लगेच तो बट्टी घेतो
स्वप्नामध्ये येता कधी
जातो घेऊन ढगांत
खाली तिथून घरात
मोठा झालेला मी दिसतो
देवालाही कधी कधी
सुट्टी असे शाळेपरी
अशावेळी माझी आई,
माझा बाबा देव होतो
झाल्यावरती मी मोठा
देव होईन म्हणतो
छोट्या इवल्या जगी जो
मनापासून रमतो
आदित्य
तेच तेच गोड गोड बोलणे पुरे तुझे
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे तुझे
रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोजचे 'उद्या उद्या' सुनावणे पुरे तुझे
एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता पुन्हा दुरावणे पुरे तुझे
गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त त्या कपास लावणे पुरे तुझे
साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक ती दुजा कुणास मारणे पुरे तुझे
संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज खेळणे अता पुरे तुझे
आदित्य
खेळ भोवती चाले विझलेल्या दीपांचा
जगावेगळा उत्सव माझा अंधाराचा
प्रकाश ज्ञानाचाच असा तर मुळीच नसतो
उजेड पडतो चिकार येथे अज्ञानाचा
डोळे मजला लागत नाहित सुख शोधाया
दृष्टी घेते ठाव नेमक्या आनंदाचा
शब्द वेगळे, तर्क वेगळे, रंग वेगळे
अर्थ वेगळा होतो माझ्या आयुष्याचा
मिटून डोळे कळते मजला कोण भले ते
उघडुनही अंदाज कधी फसतो डोळ्यांचा
दिवसा ढवळ्या स्वप्न पाहतो पंख लावुनी
फरक तसा मग उरतच नाही रात-दिनाचा
चंद्र उजळला नाही माझा कधी तरीही
कृष्णदिव्यांनी लख्ख रोजचा सण अवसेचा
दीप नको मज मार्ग उजळण्यासाठी कुठला
मीच सूर्य माझ्या विश्वातिल वसुंधरेचा
एकच इच्छा भोळी भगवंताच्या ठायी
देत रहा दृष्टांत आंधळ्या विश्वासाचा
आदित्य
अवतरली दीपांची माला
नक्षत्रांची प्रभा लेऊनी
लाजेने निस्तेज चांदण्या
अन उजळे अवसेला अवनी
प्रकाश उधळे कणाकणातुन
असंख्य किरणे नवतेजाची
तिमिर ओसरे अज्ञानाचा
लख्ख सोयरी दिशादिशांची
लखळखणारे कैक काजवे
दिवे घेउनी पाठीवरती
लवलवत्या ज्योतींच्या समयी
जणू अंगणी स्वैर नाचती
उजळोन काळा निजतम अवघा
सूर्य उगवला प्रत्येकाचा
राख जाहली रिपू रिपूंची
राम चहुकडे आनंदाचा
सृजनाचा अवतार दीप हा
हाच दीप उद्धार तमाचा
प्रेमाचीही ऊब तयाची
तेजस्वी ओंकार मनाचा
चला जागवू ज्ञानदीप मग
तुमच्या अमुच्या रोज मनातुन
सौख्याचा नित घडो महोत्सव
रोज दिवाळी घरा घरातुन
आदित्य
काळ कधीही कोणासाठी थांबत नाही
रोजच मरणे, तिळतिळ तुटणे संपत नाही
एक मित्र अन गुरू लाभला निर्गुण ईश्वर
निर्विकार पण तोही काही बोलत नाही
सोडुन आलो कितीक शहरे तुला विसरण्या
स्मृती तयांची परंतु पिच्छा सोडत नाही
मावळतीला सूर्य बुडोनी गेल्यावरती
उजेड नाही म्हणून रडणे चालत नाही
शेवट काही नसेल जर दु:खांचा माझ्या
वेदनेस गोंजारून जगतो, हरकत नाही
पाप पुण्य चे हिशोब माहित असून येथे
कोण भक्त होऊन आमिषे भोगत नाही?
वाट पाहतो रोज तुझी मी निर्मळ कविते
मुक्त निरंतर घन-घन जोवर बरसत नाही
आदित्य
पौर्णिमेचा चंद्र माझा
चांदण्याचा रंग माझा
गंधवेड्या चांदराती
तू कधी होशील माझा
रातराणी दरवळूदे
गंध माझा विरघळूदे
अंतरी येशील का तू
होऊनिया श्वास माझा
चांदण्यांमधुनी भिजावे
अन तुला भिजवून जावे
मी तुझा पाऊस होते
अन तुझा मृदगंध माझा
चांदण्याचा स्पर्श व्हावा
आठवांवर न्यास व्हावा
अन उठावे भास ऐसे
की शहारे देह माझा
लहरुनी पानांवरोनी
झिरपुनी खिडकीमधूनी
चांदणे देऊन जातो
पौर्णिमेचा चंद्र माझा
आदित्य
नकोच काही आता जगती काळे काळे
सफेद कपडे कृत्य झाकती काळे काळे
निळे निळे आभाळ कधी का नको कुणाला
परी ढगांचे रंग सुखवती काळे काळे
पांढरपेशा स्वच्छ मनांवर दिसती पाट्या
'नको मुखवटे आणिक चेहरे काळे काळे'
निषेध होतो सच्च्या शब्दांचा कारण की
डाग कागदावरती पडती काळे काळे
आरशामध्ये उमटे ना प्रतिबिंब अचानक
तेजही कसे होऊन गेले काळे काळे
लावला जरी आज दिवा प्रत्येक घराशी
अथांग हे अवकाश उद्याचे काळे काळे
आदित्य
तेच तेच गोड गोड बोलणे पुरे अता
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे अता
रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोज तू 'उद्या उद्या' सुनावणे पुरे अता
एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता तुझे दुरावणे पुरे अता
गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त तू कपास लावणे पुरे अता
साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक तू अशी दुजास मारणे पुरे अता
संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज रोज खेळणे पुरे अता
आदित्य
धरती की आभाळ यातले
कोण नेमके रडते आहे
पाणी परि भलत्याच कुणाच्या
डोळ्यांमधुनी गळते आहे
धूर सोडिती शहरे येथे
पडती भोके आभाळाला
दूर मात्र कोवळे निरागस
रान रोज धगधगते आहे
खेळ चालतो दोघांमध्ये
बुद्धिबळाचे डाव मांडुनी
पटावरी त्या लढता लढता
प्यादे नाहक मरते आहे
सौख्याचे अन आनंदाचे
होताना सण इथे साजरे
कुणी ललाटी बांधून कफनी
धारातीर्थी पडते आहे
अपराधाचा घडा अताशा
ओसंडुनिया वाहत आहे
चक्र सुदर्शन तरी एवढी
वाट कशाची बघते आहे
काळ कधी का कुणी जाणला
भविष्य सेतू कुणी पाहिला
तरी उद्याच्या आशेवरती
सृष्टी अवघी जगते आहे
आदित्य
असे कोणते पाप माझिया हातुनि घडले
किती भोगले दुःख तरीही कमीच ठरले
स्वयंवराच्या सोहळयात संयोग घडावा
तिथेच नियतीचा हा ऐसा डाव जुळावा
चुकले का मी मनोमनी श्रीरामा वरले?
सुखात होती मिथिलानगरीमध्ये जानकी
डोलत होती ऐश्वर्याची जणू पालखी
सोडुन सारे मी रामाच्या रंगी रमले
राज्याची नव्हतीच मनीषा मजला काही
जरी होतसे जयजयकार दिशातुन दाही
तरी तेवढे कारण शिक्षेसाठी पुरले
वरदान कुणी मागावे अन ते मी भोगावे
वने तुडवुनी अरण्यातुनी वास करावे
नशीबाचेही असेच काही होते ठरले
श्रीरामांच्या संगे केला राज्यत्याग मी
भगवे वल्कल नेसुन त्यजिली माझी भूमी
अन पदराशी शंकेहुन काही ना उरले
दु:खाचाही असा सोहळा आम्ही मांडला
आनंदाने छोटासा संसार थाटला
वैराग्याचे सुख नियतीला अशात सलले
पतिव्रता मी, हरुनी गेला रावण मजला
आकाशाचा श्वास नभातुन तिथेच थिजला
अंधारापलीकडले मज काही ना दिसले
जपले मी पावित्र्य मनाचे अन शरीराचे
भकास परी मी जगले जीवन सन्मानाचे
आकांते डोळ्यातील अग्नी देखिल विझले
साद घातली कितीकदा श्रीरामा तुजला
सोडव येउन कैदेतुन कायमचे मजला
विश्वासाच्या श्वासावर केवळ मी जगले
असुरांचा संहार जसा केला श्रीरामा
सीतेचीही परतुनिया आली मग गरिमा
शंकेचे परि काहूर मनी का ऐसे उठले
दगड ठेवुनी छातीवरती थेट निघाले
प्रवेश करुनी अग्नितुन मी पवित्र झाले
परीक्षेत या अनलाचेही डोळे भिजले
पावित्र्याची अशी परीक्षा का मी द्यावी
अन रामाची सुटका यातुन सहजच व्हावी
मीच एकटी का हे पातक घेऊन फिरले?
अता पोरकी झाली श्रीरामाची सीता
चारित्र्याच्या प्रश्नावर उरला ना त्राता
संशय घेणाऱ्यांशी का श्रीराम ना लढले?
न्याय मला मिळवोनी देण्या कुणी न आले
ना लक्ष्मण वा हनुमंताचे मन गहिवरले
भक्त फक्त रामाचे सारे कट्टर ठरले
पुन्हा घडे वनवास अता कायमच्यासाठी
राम उभा पुरुषोत्तम होउन लोकांपाठी
दुःख एकट्या मातेचे मातीतुन विरले
आदित्य
ओल्या ओल्या हळदीमध्ये सांज रंगली
उन्हे सरींच्या सोबत अवघ्या नभी गुंतली
पाऊस होऊन मिसळुन जाता मातीतुन मी
गंधवेल सर्वांगी सृष्टीच्या दरवळली
मी धावावे तुला भेटण्या थेट नभातुन
अन भिजवावे तुजला हिरव्या दिशादिशातुन
कुंभ रिते तुझियावर होता माझे सारे
धरा सावळी रोमारोमातुनी बहरली
सुरू जाहले वाऱ्याचे थैमान भोवती
केशर कुंद धुक्यातुन उधळे धुळीसोबती
थरथरत्या वेलीस बिलगता तुषार अवचित
धुंद मिठीतुन तारुण्याची कळी उमलली
शुभ्र कळ्यांची काच तडकते गगनामधुनी
थेंब चमकती आकाशाच्या आरशातुनी
पाण्यावरती तरंग उठता अन ओसरता
पावसातली गाणी ओठांवर अवतरली
चैतन्याचा पाट खळाळे जागोजागी
कणाकणातुन सुप्त स्पंदने होती जागी
मिसळुन जाता सूर पावसातिल नात्याशी
तुझ्या नि माझ्या नात्याची चांदणी उगवली
कोरून जाता पाऊस ऐसी संध्या हृदयी
इंद्रधनूची उधळण मनपटलावर होई
गंधवेल उगवून माझिया अंगणामध्ये
आनंदाची धारा आयुष्यात बरसली
आदित्य
नजर भेटता नजरेला मी
खोल कुठेसे बुडून जातो
कितीक क्षण मी आयुष्याचे
क्षणात एका जगून जातो
तुषार उडवत हलके हलके
झरे फुलविशी लोभसवाणे
तुझ्या तेवढ्या हास्यावरती
सर्वस्वे मी लुटून जातो
मेघ अंबरी विहरून येतो
श्रावण होउन माझ्यापुरता
ऋतूत तुझिया चातकापरी
पावसात त्या भिजून जातो
काळ थांबतो, श्वास थांबतो,
नजर तेवढी बोलत असते
बांध मुक्या शब्दांच्या वेगे
डोळ्यांमधुनी फुटून जातो
अवघी सृष्टी जुळून येते
पूर्ण होउनी माझ्याभवती
त्याच ठिकाणी येउन पुन्हा
त्याच क्षणांना जगून जातो
वाट तुझी मी होतो अन तू
प्रवास होशी माझा सारा
तुझी सावली होतो मी अन
तुझ्याच वाटेवरून जातो
आदित्य
तुझेच होऊन गेले सारे माझे काही उरले नाही
सरला नाही असा एकही क्षण की विरही झुरले नाही
कातरवेळा घेऊन येती पाऊस ओला वाऱ्यावरती
पण विरहाच्या सरींमधुनी निखार काही विझले नाही
मधेच पडला पडदा मंचावरती माझा प्रवेश होता
उभी तिथे मी तिष्ठत अजुनी नाटक तैसे संपले नाही
खिडक्या दारे बंद जाहली तशी अडकले घरात माझ्या
रातीचा मग चंद्र निमाला, कुठे चांदणे उरले नाही
मार्ग थांबले की थांबवले, जरी पावले उमटत होती
तुझी पावले जशी हरवली, मार्गही पुढचे दिसले नाही
आदित्य
आठवणींची पालवी जशी गळू लागली
चाहूल शिशिराची हृदयातुन सलू लागली
मोहरणे स्वप्नातच आता उरले केवळ
कळी कळी खुलण्याच्या आधिच मिटू लागली
थांबवले दररोज स्वतःला जळण्यापासून
आणि स्वप्नं बर्फ़ाची माझी जळू लागली
हातावरल्या रेषांमधले मार्ग बदलता
नियतीच्या खेळाची पद्धत कळू लागली
जाग अचानक आली मजला हुंदके ऐकून
अन प्राजक्तासवे रात्र ओघळू लागली
गर्दीमध्ये अनोळखी मी धडपडताना
सावलीसुद्धा माझी आता लपू लागली
आदित्य