सवाल आहे एवढाच की तुझ्यात गुंतावे की नाही
सवय एवढी लागावी अन व्यसनाधिन व्हावे की नाही
श्रावणातल्या ओल्या हिरव्या नभात वारा पिऊन सारा
पाऊस होऊन फक्त तुझ्यावर अविरत बरसावे की नाही
प्रेम म्हणू की ओढ म्हणू की भासाच्या सावल्याच नुसत्या
आभासी मृगजळात ऐशा नाते रुजवावे की नाही
एका भेटीमधली ठिणगी उठवुन गेली वादळ वणवा
हव्याहव्याशा आगीतील या निखार विझवावे की नाही
कधी वाटते जावे आणिक संपवून टाकावे सारे
चिठ्ठीतुन शेवटचे तिजला निरोप कळवावे की नाही
तू असताना वा नसताना उंच खालती घेऊन झोके
धुंद नशेचे वा विरहाचे प्याले रिचवावे की नाही
नसतील ध्यानी तुझ्या जराही माझे असले प्रश्न कदाचित
अशात तुझिया स्मृतींत मी स्वप्नांना भिजवावे की नाही
जखमा माझ्या हृदयावरच्या तशा खोलवर नाहीत अजुनी
याच समाधानावर आता स्वतःस रिझवावे की नाही
भिडल्या जर दोघांच्या नजरा उमजुन सारे मुकेच नकळत
मोजुन मापुन दोन क्षणी मग खुशाल बिघडावे की नाही
आदित्य
No comments:
Post a Comment