परतुनी जातात काही, रडवुनी जातात काही
कोरड्या डोळयात देखिल आसवे दिसतात काही
मागुनी निःशब्द हळव्या सावल्या उरतात काही
एकटा असतो अता अन पावले दिसतात काही
देव नसतो पण तिथे आता, असे म्हणतात काही!
अपुल्या शेवटच्या भेटीचा
पाऊस अजूनही आठवतो
कधी अवेळी एकांती मग
पुनश्च डोळ्यांतुन कोसळतो
कधी उमगले नाही की ती
भेटच शेवटची होती
क्षण ओसरले किती तरीही
श्वास एकटा गहीवरतो
गहिऱ्या हिरव्या डोहामध्ये
तुझ्या स्मृतींना लोटून देखिल
विस्कटलेल्या आठवणींतुन
जीव अजूनी घुटमळतो
क्षितिजावरती पेरत जाता
अपुल्या आठवणींच्या बागा
सुगंध मुक्याने इथे कोरड्या
अश्रूंसंगे दरवळतो
आदित्य
अमृताचे कुंभ जैसे चांदण्यातुन ओघळावे,
मी तुला हलकेच माझ्या भोवताली पांघरावे.
दाटले असता कधी नयनी बिलोरी चंद्र माझ्या,
मेघ मोती होत जावे अन मिठीतुन कोसळावे
ओंजळीतुन सांडता कविता कधी वाळूप्रमाणे,
वेचताना शब्द तेथे मोतियाचे सापडावे
शब्द माझे बापडे होतात जेव्हा मूक काही,
तू अशा कवितेस माझ्या डोळीयांतुन ओळखावे.
भेटलो नाही जरी प्रत्यक्ष आपण एकदाही,
पापण्यांतुन स्वप्न माझे रोज नयनी पाझरावे.
आठवांच्या पुस्तकाचे नेमके ते पान यावे,
हासणे ते आठवावे, अन् तुझे मी होत जावे
आदित्य
ओला पाऊस पाऊस
आला अनाहूतपणे
उभ्या डोळ्यांत डोळ्यांत
चांदण्याचे बरसणे
निखळून गेली पार
हळवीशी मोती माळ
आठवांचा तळ्याकाठी
थिजूनिया जाई काळ
चिंब बरसे अल्लड
ढग पांघरून झूल
गंध-मातीचे उभारे
नभापर्यंतचा पूल
भिजूनिया कवडसे
उतरती अंगणात
खेळ चाले पावलांशी
अन हुंदका मनात
धुके खिडकीमधुनी
पसरते घरातून
ओला निरोप मिळतो
पानांवर दवातून
गेला पाऊस पाऊस
मागे सोडून उसासे
स्वप्नांमधून उरती
रोज रोजचे दिलासे
आदित्य
आयुष्याला अवघ्या लाभो
अनंत अमृत-गोडी
पदरी लोभसवाणी सुंदर
नक्षत्रांची जोडी
नभी विलक्षण उत्सव
घडतो अमूर्त आनंदाचा
उजळुन जाई उत्साहाने
पडदा अवकाशाचा
ममतेचा गंगौघ कोसळे
मनात ठायी ठायी
हृदयी कवटाळूनिया होई
धन्य धन्य ती आई
काळोखाला उजळुन आली
सूर्याची नव किरणे
आता केवळ उत्साहाने
आनंदाचे झरणे
अद्वैताचे बंध जुळूदे
लक्ष्मी सरस्वतीचे
आशीर्वाद उभयतां लाभो
अखंड शिवशक्तीचे
आदित्य
आसवांची मी कहाणी काय सांगू....
प्रेम का ठरले अडाणी, काय सांगू ...
खेळ अर्ध्यातून का सोडून गेले
तोच राजा, तीच राणी, काय सांगू ...
मोजकी उरलीत आता फक्त मागे
तेवढी गीते पुराणी, काय सांगू...
भेटलो जर आठवांच्या लक्तरांशी,
ओळखीची मी निशाणी काय सांगू ?
रोज माझ्या मैफिलीमध्ये अताशा,
नांदते केवळ विराणी, काय सांगू...
तू जरी नसलीस येथे,
मी तुझ्यापाशीच आहे
आपल्यातले अंतर केवळ
सांगण्यापुरतेच आहे
तू मला दिसतेस सध्या
रोज कोठेही अचानक
खूप सारी श्वापदासम वागणारी माणसे
माणसांना माणसे ना मानणारी माणसे
लावुनी हसरे दिखाऊ चेहरे फिरतात ही
रोज अवघे सत्य खोटे पाडणारी माणसे
झापडे लावून येथे हरवती आयुष्य सारे
बंद डोळ्यांनीच मुक्ती शोधणारी माणसे
झाकलेली मूठ अपुली मिरवताना या जगी
सूर्य चष्म्याआड काळ्या झाकणारी माणसे
'त्रास होतो काजव्यांचाही अम्हाला' सांगती,
खोल अंधाऱ्या घरातुन राहणारी माणसे
जीव दुखवोनी कुणाचा वागुनी दैत्यापरी
देव दगडाला मनाने मानणारी माणसे
फक्त 'माझे', 'माझियापुरतेच' अंगण अन तिथे
'मी पणाचे' झाड मोठे लावणारी माणसे
आदित्य
गेलेले क्षण आता काही मिळणे नाही
पुस तू डोळे, ठरव यापुढे रडणे नाही
वणव्यामध्ये सुद्धा अश्रू पिऊन अवघे
जळेन पुन्हा परंतु ओले उरणे नाही
खुशाल बघ तू स्वप्न उद्याचे आणि जाण की,
स्वप्न पाहणे, स्वप्नामध्ये रमणे नाही
असेलही तो ढगाएवढा ध्यास, सिद्धता
चुकेलही पण चुकूनही घाबरणे नाही
गीतातिल अर्थात खरी बघ गंमत आहे
गाणे म्हणजे कंठशोष ओरडणे नाही
मृत्यूलाही थांबवेन मी या शब्दांनी
जगलो नाही तोवर आता मरणे नाही
आदित्य
रात्र ती हरखेल पुन्हा
तारका नटतील पुन्हा
संपलेल्या उत्सवांचा
सूर्यही उगवेल पुन्हा
एरवी थंडावलेल्या
शांतशा या मध्यरात्री
हरवलेली अचानक
माणसे दिसतील पुन्हा
काळ तो सरतोच आहे
वेळ ही भरतोच आहे
पण तरीही कोणते हे
सोहळे सजतील पुन्हा?
का उगा प्रश्नांस साऱ्या
रोज कवटाळुन बसावे
आज सोडू मोकळे, अन
ते उद्या हरतील पुन्हा
ओंजळीमध्ये जरासे
मावणारे क्षण सुखाचे
येउनी एकत्र येथे
मन्मने जुळतील पुन्हा
विसरुनी दुःखास आम्हीं
झिंगतो धुंदीत थोडे,
जोडतो अन धीर ऐसा
की मने लढतील पुन्हा
आदित्य
निःशब्द करारांचे ऋण जिकिरीचे झाले आहे
मन मारुन जगणे आता सवयीचे झाले आहे
पापाच्या अन पुण्याच्या लक्ष्मण रेखांनी येथे
आयुष्याला कुंपण-पण सक्तीचे झाले आहे
आनंदाने तुरुंग नियमांचा उपभोगत जाता,
लालुच-लक्षण ध्येयाच्या पूर्तीचे झाले आहे
असुराला, दैत्याला घाबरता घाबरता आता,
पूजेचे कारण सुद्धा भीतीचे झाले आहे
खोट्या फसव्या चेहऱ्यांच्या या जगात साधे,
खरे बोलणे चुकूनही, चोरीचे झाले आहे
दिवसा ढवळ्या राज्य चालते अवसेचे जैसे,
शहर आंधळे कुचकामी दृष्टीचे झाले आहे
'नको सांत्वने, नको दिलासे, एकांत हवा मजला'
असे काहिसे म्हणणे या सृष्टीचे झाले आहे
चितेवर तरी मनाजोगता जगेन जळता जळता,
दोन घडीचे जगणे ते मर्जीचे झाले आहे
आदित्य
रोज रोज मी मरतो येथे, कसे बसे मी जगतो येथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे.
कुठले ओझे डोक्यावरुनी जीव बिचारा वाहत जातो
कामाला मी घर सोडुनिया डोळे मिटुनी धावत जातो
कुठे नोकरी, कुठे चाकरी, रस्त्यावरती जेथे तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कर्ज काढुनी नटतो सजतो, तसे दिखाव्यापुरते नुसते
दिवस रात्र साहेबासाठी, घरी फक्त पळ-घटिका उरते
सुटला नाही साहेब देखिल अशा दुष्ट चक्रातुन येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
श्वास चालती प्रत्येकाचे घड्याळातल्या काट्यावरती
हिशोब अन वेळेची केवळ सूत्रे आठवणींतुन उरती
चंद्रसूर्यही उरकुन जाती दिवसरात्र नावाला जेथे,
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
चालू असती व्यायामाचे महागडे क्लासेस नव्याने
कधी पेव योगाचे फुटते, कधी नृत्यही नवे-पुराणे
तरी औषधासाठी रांगा लांब लांब दिसतातच तेथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
स्टोरी आणिक स्टेटसचाही महापूर येताना दिसतो
प्रत्येकाच्या मैत्रीचा बाजार केवढा उत्तम भरतो
माणुस उरतो परी एकटा सोशल होता होता येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
नाती उरती कागदावरी केवळ सध्या घराघरातुन
एकच घरटे दिसायला पण वेगवेगळे मनामनातुन
रेशिमगाठी आता दिसती सैल सैल होताना येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
कशास आणिक कुठली शर्यत चालू असते ठाऊक नाही
अंत कधीही, कुणासही, स्पर्धेचा येथे दिसला नाही
मरताना परि जाणिव होते, हाय! हरवले जगणे येथे
रोज आमिषापोटी साध्या, आनंदाला मुकतो येथे
---आदित्य
नसेल आता तुझे असे उरलेले काही, हरकत नाही
स्मृती सुद्धा काहीशा अपुऱ्या जगण्यासाठी, हरकत नाही
निघून तू गेलीस जरीही कायमची मार्गातुन माझ्या
रोज तरी मी ओघळेन प्राजक्त होऊनी, हरकत नाही
कधी रडावे असे वाटता कुशीत तुझिया येऊन मजला,
पाखरांसावे धाडीन अश्रू तुझ्याच पदरी, हरकत नाही
आठवणींच्या कवितेमधुनी तरळुन जाइन अलगद अस्फुट
भेटत राहीन पिंपळपानापरी वहीतुन, हरकत नाही
जिथे कुठे असशील अता तू, झरे सुखाचे फुलतिल तेथे
इथे स्मृतींचा राहील थोडा ओलावा, पण हरकत नाही
आदित्य
कशास काही विवाद व्हावा प्रेमामध्ये
मुक्यानेच संयोग घडावा दोघांमध्ये
तुझे ठेव तू तुझ्याच पाशी सल्ले सारे
उगा नको भलताच दुरावा नात्यामध्ये
तेच तेच ते रटाळ गाणे गाता गाता
फाटका तरी सूर जुळावा गाण्यामध्ये
असेच 'नाही' म्हण तू मजला लाजुन जाता,
की लाडिक होकार दिसावा जाण्यामध्ये
कधी भेटलो जर का आपण तसेच पुन्हा,
तशीच धडधड होईल का गे श्वासांमध्ये?
अजूनही मी लिहितो पत्रे तुला गुलाबी
अजूनही दव दिसेल तुजला शब्दांमध्ये
--आदित्य
यमदूताचाही जेथे जेथे थिजला पारा
उभा ठाकला रणी तूच होऊन सहारा
झेललास छातीवरती धगधगता वणवा
तूच अढळ शक्तीचा झेंडा , तू ध्रुवतारा
श्वास आजचे लाखो केवळ तुझ्याच पायी
एक एक किंकाळी घुमते ठायी ठायी
तिथे सांडले रक्त तुझे तू दैत्य जाळतो
नतमस्तक मी अभिषेकी अश्रूंस गाळतो
आदित्य
म्हणतो आता सारे काही
सोडुन द्यावे उरले सुरले
म्हणता म्हणता श्वास राहतिल
इथे मोजके उरले सुरले
आरोपांच्या फैरी झडती
तुझ्या नि माझ्या कितीतरीदा
माफी मागुन संपवून टाकू
हे नाते उरले सुरले
नसतिल जर का खोल वेदना
हृदयामध्ये जिवंत काही
नकोत फुटकळ आनंदाचे
क्षण-बिण साधे उरले सुरले
कधी हरवतो काचांमध्ये
खरा मार्ग शोधूया म्हणता,
आरशात मी मज सापडतो,
बाकी तुकडे उरले सुरले
उत्तरेच प्रश्नांची काही
घेऊन येती प्रश्न नव्याने
दोन घोट घेऊ त्यापेक्षा
प्रश्नच रिचवू उरले सुरले
मित्र जवळचे शोधत जाता,
सापडतो संकटात, उरतो
एकटाच लढणारा मी,
बघणारे बाकी उरले सुरले
मीच कधी माझ्याशी करतो
द्वंद्व मूळ तत्वांच्या साठी
लिहून जातो शब्द काहीसे
असंबद्ध अन उरले सुरले
आदित्य
मी कधी आयुष्य होतो
सर्जनाचा थेंब होतो
रंगुनी पानफुलांनी
डोलणारा वृक्ष होतो
खेळतो सूर्यासवे मी
रोज नवखा डाव ऐसा
चंद्र होतो पौर्णिमेचा
अन कधी अंधार होतो
मी कधी तलवार होतो
शत्रुचा संहार होतो
थेंब रक्ताचाच माझ्या
तळपुनी अंगार होतो
शुभ्र आकाशात मिसळुन
रंग पांघरतो निळा मी,
कोवळ्या अन भाबड्या
मन-पाखरांचे पंख होतो
मोकळे अवकाश काळ्या
काजळीने व्याप्त होता
वादळाचे रूप घेतो,
अन कधी मल्हार होतो
श्वास येथे अडखळोनी
घुसमटू लागे अताशा,
पाहता तडफड कुणाची
मी पुन्हा विश्वास होतो
भूत सारी अन रिपूही
मोकळे, मोकाट होता,
रोज सत्याचा असत्याशी
इथे संघर्ष होतो
संभ्रमामध्ये कधी मज
प्रश्न पडतो 'हेच का ते
विश्व माझे गर्भ-सुंदर?'
आणि मी व्याकूळ होतो.
आग, वणवे अन मशाली
पेटती दररोज येथे
पाहतो की रोज जगती
सर्जनाचा ऱ्हास होतो
बैसलो आहे रुतूनी
दलदलीमध्ये जगाच्या
त्यातल्या कमळापरी मी
भंगलेले फूल होतो
संपुनी जातात सारे
स्वप्नवत क्षण त्या स्मृतींचे
विसरुनी जातो अता की
मी कधी आयुष्य होतो
आदित्य
तू नको बोलूस काही,
गप्प मी ही राहतो
'कोण आधी बोलते'
बस वाट दोघे पाहतो
तू मुके बोलाव मजला
शब्द ना उच्चारता
ऐकूही येता न काही
मी तुझ्याशी बोलतो
शब्द अडखळती तुझे
अन श्वासही हेलावती
मी तसा डोळ्यांमधूनी
अर्थ सारे जाणतो
भेट व्हावी याचसाठी
येउनी जातेस तू अन
ते तुझे येणे नि जाणे
मी लपूनी पाहतो
बोलक्या नजरेमधूनी
गोष्ट सारी होत जाते
तू कधी लाजून जाता,
मी मनोमन हासतो
वेळ साधुन मी कधी
मग भेटण्या येतो तुला
अन तुझे लटकेच रुसवे
केवढे सांभाळतो
आदित्य
मौन पाळले ओठांशी आलेल्या शब्दांनी माझ्या
करार होता कसाबसा केलेला ओठांनी माझ्या
शिकलो आता मुक्यानेच सांगायाचे सारे काही
धीर सोडला तरी कधी वाहुनिया डोळ्यांनी माझ्या
असे वाटते फक्त मला जमले नाही विसरून जाणे
जमले सारे तुला मात्र मी सजलो जखमांनी माझ्या
तशी हासुनी मारून नेली वेळ भेटता तू जेव्हा
कोपऱ्यातला ओलावा टिपलेला डोळ्यांनी माझ्या
दिसे उभी तू तटस्थ पुनवेच्या राती स्वप्नातुन अन
चिंब चांदणे रिमझिमते डोळ्यांतिल चंद्रांनी माझ्या
काय नेमके झाले ऐसे मार्ग वेगळे अपुले गे,
दिलेस नाही उत्तर तू अन हरलो प्रश्नांनी माझ्या
हाय! अपेक्षा तुझी तुला मी क्षणार्धात विसरून जावे
खोटे का क्षण सारे जे अनुभवले श्वासांनी माझ्या?
करार मौनाचा अपुला पाळुन ठरलो पुरता वेडा
अजूनही तो जपतो, रडतो अवचित शब्दांनी माझ्या
आदित्य
शुभ्र शुभ्र ढगांमध्ये
मोठा बंगला दिसतो
देव आमच्या घरचा
तिथे वरती राहतो
रोज खाली येतो बाप्पा
दिवेलागणीच्या वेळी
शुभंकरोती ऐकून
छान हसूनिया जातो
गोड आवडते त्याला
कधी बर्फी कधी पेढा
कधी साखरेचा फक्त
नैवेद्यही त्याला पुरतो
इथे वाईटशा गोष्टी
त्याला कळतात साऱ्या
ठेवतो तो लिहून हे
आणि शिक्षाही करतो
देवाशी मी कट्टी घेता
थोडा थोडासा रुसतो
झाल्यावरती अभ्यास
लगेच तो बट्टी घेतो
स्वप्नामध्ये येता कधी
जातो घेऊन ढगांत
खाली तिथून घरात
मोठा झालेला मी दिसतो
देवालाही कधी कधी
सुट्टी असे शाळेपरी
अशावेळी माझी आई,
माझा बाबा देव होतो
झाल्यावरती मी मोठा
देव होईन म्हणतो
छोट्या इवल्या जगी जो
मनापासून रमतो
आदित्य
तेच तेच गोड गोड बोलणे पुरे तुझे
भेटुनी सुद्धा उपास पाळणे पुरे तुझे
रोज मी विचारतो कि प्रेम व्हायचे कधी
रोजचे 'उद्या उद्या' सुनावणे पुरे तुझे
एकटेपणास मी तसा जरी सरावलो
सात वाजता पुन्हा दुरावणे पुरे तुझे
गोडवा कधी तरी टिपून घेऊदे मला
ओठ फक्त त्या कपास लावणे पुरे तुझे
साद मी दिली क्षणात हाक ऐकता तुझी
हाक ती दुजा कुणास मारणे पुरे तुझे
संभ्रमात राहिलो कि भाळलीस तू सुद्धा
'प्रेम प्रेम' रोज खेळणे अता पुरे तुझे
आदित्य